तेलंगणात मंत्रिमंडळ विस्तार   

हैदराबाद : तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. रेड्डी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असून, काल काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळातील सदस्य संख्या मुख्यमंत्र्यांसमवेत १२ वर पोहोचली. मात्र, अद्याप सहा पदे रिकामी आहेत. ती कधी भरली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. शिवाय, त्यासाठी आमदारांकडून मोर्चेबांधणीदेखील होणार आहे. रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काल सत्तारूढ काँग्रेसचे आमदार जी. विवेक वेंकट स्वामी, ए. लक्ष्मण कुमार आणि वक्ति श्रीहरी यांचा समावेश झाला. दुपारी १२ वाजता राजभवनात शपथविधी पार पडला.
 
डिसेंबर २०२३ मध्ये रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. शपथविधी सोहळ्यानंतर रेड्डी यांनी नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. रेड्डी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे पक्षाचे आमदार रामचंद्र नाईक यांना विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. मागील काही दिवसांपासून तेलंगणातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
 
रेड्डी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. महेश कुमार गौड यांनी नवीन मंत्र्यांच्या समावेश आणि प्रदेश काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीबाबत दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेतृत्वाशी चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्तार करताना काँग्रेसने सामाजिक न्यायावर भर दिला. विवेक आणि लक्ष्मण कुमार अनुक्रमे अनुसूचित जाती (माला) आणि अनुसूचित जाती (मडिगा) समुदायाचे आहेत, तर श्रीहरी हे मागासवर्गीय नेते आहेत. रामचंद्र नाईक हे अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करतात.काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते जी. वेंकटस्वामी यांचे पुत्र विवेक वेंकट स्वामी हे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते लोकसभेवरही निवडून गेले होते. विवेक यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. मात्र, त्यानंतर काही काळ ते भाजप आणि बीआरएसमध्ये होते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये परतले होते. विवेक यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांचे मोठे बंधू जी. विनोद हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
 
गौड यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या (टीपीसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून कार्यकारी अध्यक्षसह प्रदेश काँग्रेसची अनेक पदे रिकामी आहेत.
 

Related Articles